top of page

शिवलिंग, रुद्राक्ष, भस्म व ज्योतिर्लिंग माहात्म्य

Updated: Mar 9, 2023


परम पुरुषाची हिंदु पौराणिक कथेत पंचरूपाने उपासना करण्याची परंपरा आहे. याला 'पंचदेवोपासना' म्हणतात. शिव-विष्णु-शक्ती-गणेश आणि सूर्य या पाचांचे गोल प्रतिक करतात. या पंचदेवांची उपासना लिंग बनवून केली जाते. अनेक मंदिरामध्ये शंकर पार्वतीच्या साकार मूर्ती असतात. परंतु येथेही लिंगस्थापना केलेली आढळते. अर्थात शिवलिंग शंकराचे निराकार स्वरुप आहे. त्यामुळे लिंगपूजा करण्याचाच प्रघात आहे. शिवाच्या ज्या भिन्न देवता आहेत, त्या साक्षात ब्रह्म नाहीत. त्या कारणाने त्यांचे निराकार लिंग प्रमाणित होत नाही. लिंग साक्षात ब्रह्माचे प्रतिक आहे.











शिवलिंग : वराह काल्पामध्ये लिंगोद्भावाची एक कथा सांगितली आहे. दारुक वनात अनेक मुनीगण एकत्र रहात होते ते सर्व वैदिक कर्मकांड सावधानतेने करीत होते त्या ऋषीमुनींवर अनुग्रह करणेसाठी व त्यांना निवृत्तीमार्गाचा उपदेश करुन प्रत्यक्ष स्वरूप दाखविणेसाठी भगवान शंकर तेथे गेले. त्यावेळी ते दिगंबर अवस्थेत होते. तीन नेत्र, दोन भुजा, सोडलेल्या जटा, अत्यंत सौंदर्ययुक्त सुकुमार शरीर, विशाल वक्षःस्थल, उन्मत्तपणे चालले होते. त्यावेळी ऋषी मुनी वनात फळे, फुले, समिधा आणणेसाठी गेले होते. ऋषीपत्नींनी तो सुंदर तरुण दिगंबर अवस्थेत पाहिला. त्यांच्या अंतःकरणात विकार निर्माण झाला. कामवासनेमुळे त्यांचे चित्त विचलित झाले. त्यासंयमी होत्या, तपस्वीनी होत्या. तरीपण देहभान विसरून त्या परम पुरुषाच्या मागे मागे जाऊ लागल्या. त्यांची वस्त्रे अस्ताव्यस्त झाली, कांही स्त्रिया अर्धनग्नावस्थेत नाचू लागल्या व एकमेकींना अलिंगन देऊ लागल्या. हावभाव करुन नेत्र कटाक्षाने रुद्राला त्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करु लागल्या. त्यांनी गोल मंडल करून रुद्राचा मार्ग अडविला आणि म्हणाल्या, हे भुवन सुंदर ! आमच्यावर प्रसन्न व्हा. आपण कोण आहात ? कशासाठी आलात ? याठिकाणी विराजमान व्हा. परंतु भगवान शिव आत्मलीन झाले होते. त्यांनी झाले कुणाकडेही पाहिले नाही. ते असे चालत होते कीं, त्यांना पुढे स्त्रिया आहेत की पशु आहेत हे समजत नव्हते. ऋषीगण वनातून आश्रमाकडे परतले. त्यांनी आपल्या पत्न्यांना कामपीडित अवस्थेत पाहिले. त्यांच्यामध्ये कृष्णवर्ण दिगंबर अवस्थेत पुरुष पाहिला. मुनींना वाटले हा पुरुष आपल्या पत्न्यांना भ्रष्ट करीत आहे. म्हणून त्यांनी कांहीही विचार न करता त्याला क्रोधाने शाप दिला. तू या स्त्रियांच्यामध्ये दिगंबर राहून त्यांच्या न मर्यादेचा भंग केला आहे, म्हणून तुझे उपस्थ तात्काळ गळून पडेल. आणि गळून पडल्याक्षणीच ते प्रज्वलीत झाले. आणि मार्गात जे काही पडले असेल त्याला भस्म करीत सुटले. चारी दिशांना ते फिरु लागले. ते पाहून सर्व ऋषी-मुनी भयग्रस्त झाले. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. आणि प्रार्थना करु लागले हे सृष्टीकर्ता ! कृपा करुन आपल्या सृष्टीला वाचवा. हे नीललोहिताचे गळून पडलेले लिंग एवढे गतिमान झाले आहे की, ते त्रिलोकाला भस्म करुन टाकेल. ब्रह्मदेव म्हणाले, हा रुद्र आहे. माध्यान्हकाळात परिगृहहीन दिगंबर, निर्दोष अच्युताचा आतिथ्यपूर्वक सन्मान करण्याऐवजी आपण अविचाराने त्यांना शाप दिला हा तुमचेकडून मोठा अपराध घडला. सर्व मुनींनी शरणागती पत्करली. त्यांनी त्या लिंगाचे बारा भाग केले. तरीही ते सर्व पृथ्वीवर हाहा:कार माजवू लागले. शेवटी सर्वांनी मिळून भवानी पार्वतीची आराधना केली. जगदंबा प्रगट झाली. तिला ऋषी-मुनींची व सृष्टीविनाशाची दया आली. तिने योनीरुपा होऊन ते लिंग धारण केले. मग सर्व ऋषी-मुनींनी त्या शांतलिंगाचे अर्चन केले. तेव्हांपासून ठिकठिकाणी पडलेली ही लिंगे बारा ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाली. या कारणाने शिवलिंग शिश्नाकारी मानले जाते. वामाचार, योगाचार आणि शिवपूजक संप्रदायात शिश्नाकार लिंगाची अर्चना केली जाते. सर्व भक्तांवर कृपा करण्याच्या उद्देशाने भगवान शंकर नाना प्रकारे लिंग धारण करतात. जो सिद्धीची इच्छा करतो, त्याने शिवलिंग पूजन करावे. या भू-मंडलावर जितकी शिवलिंगे आहेत त्यांची गणना करणे अशक्य आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने मानवाचा उद्धार होतो. लिंगपूजा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.






शिवलिंग फल : भिन्न पदार्थाने बनविलेल्या लिंगापासून विभिन्न फल शास्त्राने प्रतिपादन केले आहे. कस्तुरी आणि चंदनाने बनवलेले शिवलिंग शिवसायुज्य प्राप्त करुन देते. जवस, गहू आणि तांदुळ या तिन्हीचा आटा समान घेऊन जे शिवलिंग बनवले जाते त्याच्या पूजनाने स्वास्थ, संपत्ती आणि संतान मिळते. साखरेच्या शिवलिंगाची पूजा रोगापासून सुटका करते. सुंठ, मीरची, पिंपळाचे चूर्ण व मीठ एकत्र मिसळून केलेल्या शिवलिंग उपासनेने वशीकरण, व्यभिचार कर्मासाठी केला जातो. भिगेतीळाचा पिस करुन बनवलेले शिवलिंग अभिलाषापूर्ति करते. यज्ञकुंडातल्या भस्मापासून तयार केलेल्या शिवलिंगाच्या पूजेने अभिष्ट फल प्राप्त होते. कोणाचेही प्रेम संपादन करणेसाठी गुळापासून शिवलिंग करून पूजन करावे. सुख-शांती प्राप्तीसाठी चीनी मातीचे शिवलिंग पूजावे. लक्ष्मी आणि सुख प्राप्ती लोण्याच्या शिवलिंग पूजनाने होते. आवळ्याच्या पीठाचे शिवलिंग पूजेने मुक्ती मिळते. वृक्षाच्या पानापासून केलेल्या शिवलिंग पूजनाने स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते. दुर्वांकुर शिवलिंगाकार गुंफून पूजा केलेने मृत्युचे भय नष्ट होते. कापूरापासून बनवलेले शिवलिंग पूजेने भक्ती व मुक्ती मिळते. लोहापासून केलेल्या शिवलिंगाच्या पूजनाने सिद्धी मिळते. मोत्याच्या शिवलिंगाचे पूजन स्त्रीचे भाग्यवृद्धि करते. सुवर्णाच्या शिवलिंग पूजेने समृद्धी प्राप्त होते. चांदीचे शिवलिंग धनधान्य प्राप्त करून देते. पितळेचे शिवलिंग दारिद्र्य नष्ट करते.




शिवलिंग पुष्प पूजा : शिवलिंगाची विविध फुलांनी केलेली पूजा विभिन्न फल देते. दुर्वा पूजनाने आयुष्य वृद्धि, धोत्र्याच्या पूजनाने पुत्रप्राप्ती, तुळशीदलाच्या पूजेने भोग व मोक्षप्राप्ती, बेलाच्या पूजनाने सुलक्षणी पत्नी, जाईच्या पूजनाने अन्नपूर्णा प्रसन्न होते. कण्हेरीच्या पूजनाने वस्त्रप्राप्ती होते. सर्वात जास्त बेलाच्या फुलाच्या वाहण्याने भगवान शंकर तृप्त होतात. फक्त चाफा आणि केवड्याची फुले सोडून बाकी सर्व फुले पूजेसाठी ग्राह्य ठरतात. त्याचप्रमाणे जलधारेचेही महत्व शास्त्रात सांगितले आहे. जलधारा भक्तीभावाने समर्पित करणाया मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात. ज्याची बुद्धि क्षीण झाली असेल त्या अवस्थेत उपासकाने साखर मिश्रित दूधाची धारा समर्पित करावी. बिल्ववृक्ष भगवान शंकराचे रूप आहे. तिन्ही लोकांत जितकी तीर्थे प्रसिद्ध आहेत, ती सर्व तीर्थे बिल्व वृक्षाच्या मुळाशी निवास करतात. तेथे अविनाशी लिंगस्वरूप महादेवाची गंध, पुष्प, फळांनी पूजा करून जो नित्य दीप लावतो. तसेच अन्नदान करतो व बिल्व वृक्षाचे झाड लावतो त्याच्या सर्व कुळांचा उद्धार होतो व तो शिवपदाला प्राप्त होतो.



रुद्राक्ष माहात्म्य : सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव प्रगट झाल्यानंतर भगवान शिव सहस्रवर्षे एकाग्र चित्ताने दिव्य तपस्या करू लागले. त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची भावना निर्माण झाली. म्हणून त्यांनी लीलापूर्वक आपले दोन्ही नेत्र उघडले. त्यावेळी त्यांच्या मनोहर नेत्रातून दोन जलबिंदु खाली पडले. त्यातून रुद्राक्ष आणि भद्राक्ष या दोहोंची उत्पत्ती झाली. त्यांची श्वेत, रक्त, पीत आणि कृष्ण अशा चार प्रकारच्या रुद्राक्षाची निर्मिती झाली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या चार वर्णाकरिता फलदायी आहे. श्वेत रुद्राक्ष ब्राह्मणाने धारण करावा. क्षत्रियाने लाल रंगाचा, वैश्याने पिवळ्या रंगाचा आणि शूद्राने काळ्या रंगाचा रुद्राक्ष धारण करणे वेदयुक्त मार्गाचे व हितकारक आहे. ज्याला किड्याने दूषित केले आहे. छिन्न-भिन्न, कर्णहीन, व्रणयुक्त, गोलाकाररहित हे पाच प्रकारचे रुद्राक्ष त्याज्य आहेत. ज्या रुद्राक्षाला नैसर्गिक छिद्र असते, तो उत्तम रूद्राक्ष समजावा, रुद्राक्ष एकमुखीपासून चौदा मुखीपर्यंत आहेत. त्या प्रत्येकाचा प्रभाव व स्थान वेगवेगळे आहे ते असे


एक मुखी : शिवस्वरूप आहे. भोग आणि मोक्ष प्रदान करतो. जेथे या रुद्राक्षाची पूजा होते, तेथून लक्ष्मी दूर जात नाही. तेथील उपद्रव नष्ट होवून सर्व कामना पूर्ण होतात.

दोन मुखी : देव देवेश्वर स्वरुप आहे. गोहत्येचे पातक निवारक आहे.

तीन मुखी : हा विधाता स्वरुप आहे.

चार मुखी : हा ब्रह्मदेव स्वरुप असून चारी पुरुषार्थाचा दाता आहे.

पाच मुखी : हा साक्षात फलाग्निरुप आहे. मुक्ती, मनोवांछित फळ देणारा व समर्थ आहे.

सहा मुखी : कार्तिकेय स्वरुप आहे. उजव्या बाहूत धारण करतात. ब्रह्महत्या आदि पापांचे निवारण करणारा आहे.

सात मुखी : अनंत स्वरूप आहे. दरिद्रीसुद्धां ऐश्वर्य संपन्न होतो.

आठ मुखी : अष्टमूर्ती भैरव स्वरुप आहे. सर्व विघ्ने दूर करुन आयुष्य देतो आणि मृत्युनंतर शूलधारी शंकर होतो.

नऊ मुखी : हा दुर्गास्वरुप आहे. हा कंठात धारण करतात. सर्वेश्वर पद प्राप्त करून देणारा आहे.

दशमुखी : हा विष्णुस्वरुप आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारा असून हा सर्व ठिकाणी धारण केला जातो.

अकरा मुखी : हा रुद्रस्वरुप - आहे. सर्वत्र विजय प्राप्त करुन देणारा आहे. हा शिखेत धारण केला जातो.

बारा मुखी : हा आदित्य स्वरुप आहे. केसात धारण केला जातो. हा डोळ्यांच्या सर्व विकारांचे निवारण करतो. तसेच बुद्धि व स्वास्थ देणारा आहे.

तेरा मुखी : हा विश्वदेव स्वरुप आहे. हा सौभाग्य आणि मंगलदायी आहे.

चौदा मुखी : हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ आहे. हा परम शिवस्वरूप आहे. हा मस्तकावर धारण केला जातो. पापहारी व परम फलदायी आहे. एकमुखी व पंचमुखी रुद्राक्ष मनुष्याने धारण करणे श्रेष्ठ समजले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने अनंत फलाची प्राप्त होते. स्त्रियाही वापरतात.



भस्म त्रिपुंड : जो मंत्रयुक्त विभूतीने आपल्या कपाळी त्रिपुंड, धारण करतो तो रुद्ररूप होतो. कुठल्याही यज्ञ कुंडातील लावलेला भस्माचा त्रिपुंड उत्तम मानला जातो. अग्निहोत्रातला भस्मही श्रेठ आहे. कपिला गाईचे शेण भूमीवर पडण्या अगोदर हातावर धरून विभूति करावी. पिंपळाची साल जाळून ते भस्म गायीच्या दूधात ओला करून पिंडाकार करुन जाळावा. हा भस्म कोमल असतो. नाथसंप्रदायामध्ये हा भस्म सर्व शरीराला लावतात. प्रथम कपाळी आंगठ्याने एक रेखा ओढावी. पुन्हा अंगठा सोडून अनामिका आणि तर्जनी या दोन अंगुलीद्वारा दोन रेखा ओढाव्यात अशा प्रकारे तीन भस्मरेखा दिसल्या जाणाऱ्या शिवभक्तास शिवासमान मानतात.


श्रीद्वादश ज्योतिर्लिंग व उपलिंग :

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् | उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्चरम् ||१||

सौराष्ट्र प्रदेशात सोमनाथ, श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन, उज्जयनी क्षेत्रात श्रीमहाकाल (नर्मदा किनारी) अमलेश्वर म्हणजे ओंकारेश्वर.


'परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमाशङ्करम् । सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ||२||

परळीमध्ये वैजनाथ, डाकिनीमध्ये भीमाशंकर, सेतुबंध तीर्थक्षेत्रात रामेश्वर, दारुकावनात नागेश (नागनाथ ).


वाराणस्या तु विश्वे विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ||३||

वाराणसी (काशी) क्षेत्रात विश्वनाथ (विश्वेश्वर), गौतमी म्हणजे गोदावरी नदीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, हिमालय पर्वताचे शिखरावर केदारनाथ आणि शिवालय तीर्थ भागात घुश्मेश (घृष्णेश्वर).


एतानि ज्योतिर्लिङ्गनि प्रायंप्रातः पठेन्नरः । सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

जे भाविकभक्त प्रतिदिन सकाळी व सायंकाळी या बारा ज्योतिर्लिंगाची नांवे स्मरण करतील, त्यांची सात जन्मामध्ये केलेली सर्व पापे ह्या नामस्मरणाने नष्ट होतील.


उपलिङ्गे :

१) सोमनाथ संबंधी ओंकारेश्वर हे उपलिंग महीनदी आणि समुद्राच्या संगमावर स्थित आहे.

२) मल्लिकार्जुन रुद्रेश्वर हे उपलिंग भृगुकक्ष स्थानात स्थित आहे.

३) महाकाल संबंधी दुग्धेश्वर हे उपलिंग दूधनाथ या नांवाने नर्मदेच्या काठावर स्थित आहे.

४) ॐकारेश्वर संबंधी नर्मदेश्वर नांवाचे उपलिंग बिंदु सरोवराच्या काठावर प्रसिद्ध आहे.

५) केदारेश्वर संबंधी भुनेश्वर हे उपलिंग यमुनाकाठी मथुरेत स्थित आहे.

६) भीमाशंकर संबंधी भीमेश्वर हे उपलिंग सह्य पर्वतावर स्थित आहे.

७) नागेश्वर संबंधी भूतेश्वर हे उपलिंग मल्लिका नदीकाठी स्थित आहे.

८) रामेश्वर संबंधी गुप्तेश्वर हे उपलिंग. याच्या स्थानांचा निश्चय करणे कठीण आहे. या नांवाची अनेक लिंगे देशभरात आहेत.

९) घृष्णेश्वर संबंधी व्याघ्रेश्वर हे उपलिंग अनिश्चितच आहे.



शिवलिंग पूजेचे काही नियम :

१) शिवलिंग पूजेचे वेळी हाताने टाळी वाजवू नये.

२) शिवलिंगाची प्रदक्षिणा पूर्णपणे केली जात नाही. कारण अभिषेकाने पाणी जेथून बाहेर पडते त्या वाहकाचे उल्लंघन केले जात नाही म्हणून तेथून उलट फिरून अर्धीच प्रदक्षिणा केली जाते.

३) शिवापाशी नारळ न फोडता अखंडच ठेवावा.

४) दुध आणि पाणी एकत्र लिंगावर वाहू नये. अभिषेक पात्रात दुप घेऊ नये.

५) व्यालेल्या गायीचे दूध एकवीस दिवसानंतर अभिषेकास वापरावे.

६) हरिहर, शिवशक्ती एकरूप मानून पूजन करावे.

७) एकाच घरात दोन शिवलिंग पूजन करू नयेत.

८) निरंजनात तूप व तेल एकत्र घालू नये.

९) संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही शिवव्रत करू नये.

१०) शिवमंदिरात झांज वाजवू नये.

११) भगवान शिवाला एका हाताने नमस्कार करु नये.

१२) गृहस्थाश्रमीने ओले धोतर नेसून शिवपूजन करू नये.

१३) 'ॐ नमः शिवाय' या पंचाक्षरीचा जप करावा.

१४) वेलाचे पान देठ तोडून भिजवून लिंगावर पालथे वाहावे.

एक वर्षभरात शिवाचे पूजन व अनेक व्रते केल्याने जे फल प्राप्त होते ते सर्व फल केवळ एका शिवरात्रीच्या उपवासाने व पूजनाने प्राप्त होते. भजनाने विष्णु व पूजनाने शिव प्रसन्न होतो.





bottom of page